Monday, May 11, 2020

काव्यास्वाद – लिहिणाऱ्या हातांचा उत्सव 
काव्यास्वाद 
माधव राघव प्रकाशन ताळगाव, गोवा  यासंस्थेतर्फे  ‘काव्यास्वाद’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये एका कवी/कवयित्रीची कविता/गझल अथवा मुक्तछंदातील रचना घेऊन त्या रचनेचे  रसास्वादात्मक रसग्रहण करण्याचा उपक्रम सुरू आहे. गझलकार, पत्रकार व साहित्यिक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर तसेच कवयित्री चित्रा क्षीरसागर हे रसग्रहण करणार आहेत. या सदरात कवीचा अल्पपरिचय, प्रकाशित पुस्तके समाविष्ट करण्यात येतो.
आजच्या सर्जनशील कवयित्री आहेत, नागपूर येथील प्रा. मीनल सुरेश येवले. 
प्रा. सौ. मीनल सुरेश येवले 
एम. ए. बी. एड. एम. फिल (मराठी)
ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय कुही जि. नागपूर येथे अध्यापन (कनिष्ठ व्याख्याता) 
प्रकाशित पुस्तके 
कवितासंग्रह 
मोहोर (२००७), परिघ (२०१३), मी फूल मातीचे (२०१७), वेदनेला फुटे पान्हा(२०१९)
ललितलेखसंग्रह आंदण (२०१७), एकांताचे कंगोरे (२०१९), कवितेच्या पाऊलवाटा (प्रकाशनाच्या वाटेवर) अनेक साहित्य संस्थांचे मानाचे पुरस्कार त्यांच्या कवितासंग्रह व ललितलेख संग्रहांना मिळाले आहेत.  यात प्रामुख्याने विदर्भ साहित्य संघ, स्व. सूर्यकांतादेवी पोटे राज्यस्तरीय पुरस्कार, पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूरचा साहित्य पुरस्कार, शिवचरण उजैनकर फाउंडेशनचा तापीपूर्णा साहित्य पुरस्कार अंकुर साहित्य संघाचे साहित्य पुरस्कार तसेच आदर्श टीचर्स असोसिएशनचा शिक्षिका पुरस्कार  त्यांना मिळाला आहे. 
आंदण या ललितसंग्रहातील वसंतवेणा लेख अमरावती विद्यापीठाच्या मृद्गंध भाग -१ या बी. ए. प्रथम वर्षाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट. अनेक दिवाळी अंकातून त्यांच्या कविता व ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या अनेक लेखमाला विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या आहेत.  नागपूर तरुण भारत आदी वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध झालेले आहे. आकाशवाणी नागपूरवर त्यांचे कवितावाचन झाले आहे.  

त्यांच्या बऱ्याच कविता कोमल हृदयाचे प्रतीक आहेत. मातीचे मार्दव त्यांच्या कवितेत दिसते. तू येताना ही कवितादेखील अशीच मातृत्वभावनेने ओतप्रोत भरलेली  आहे. या कवितेप्रमाणेच त्यांच्या इतर कविताही मृदू व कोमल भावनेने भारलेल्या व भरलेल्या आहेत. त्यांच्या हृदयातील ही भावना प्रकट करताना त्या मुळीच आक्रस्ताळेपणा करीत नाहीत. शिक्षकी पेशात असल्याने त्यांना इतरांना समजून घेण्याची कला अवगत असेल. 
तू येताना ही कविता अशीच नवविवाहितेच्या जीवनात आई होण्याचा जो महत्त्वपूर्ण क्षण असतो त्याचे वर्णन करणारी आहे. या कवितेत सृजनाचे गाणे ऐकू येते. 

तू येताना....

काळजावरी जेव्हा पडली तुझी चिमणपावले 
त्याच क्षणातून नवसृजनाचे विश्व मला गावले 

दुःख वेचुनी वाटेवरचे हात दिला जगताना 
पदरी माझ्या पुण्य पाडले नको नको म्हणताना 

स्नेह जुळविता पुलाखालुनी किती वाहिले पाणी 
काही ओंजळीत, काही पापणीत त्यांची जुळली गाणी 

मनात अत्तर सोडून जाते, तळहातावर रंग
दरवळ, रुणझुण सभोवताली सुखस्वप्नांचा संग 

जन्मा घालीन,  तुला जोजविन कितीही सोशीन कळा 
शब्दसखी गे लाव मस्तकी अस्तित्वाचा टिळा 

तुझी गोजिरी  साद ऐकण्या ऐलतिरावर उभी 
पैलतिराहून येताना तू लख्ख चांदणे नभी 
प्रा. मीनल येवले नागपूर 
(७७७४००३८७७)

मीनलताई या कवितेतून आपल्या उदरात प्रकट होत असलेल्या नवअर्भकाच्या चाहुलीचे वर्णन करतात.ती हळुवार मृदू मुलायम पावले  ही चिमणपावले प्रत्येक सर्जनशील अशा मातेला सुखावत असतात. ही पावले काळजावर पडली असे त्या म्हणतात. एखाद्या अत्यानंदाच्या क्षणी किंवा अत्यंत विव्हल अवस्थेत काळजाचा ठोका चुकतो म्हणतात, सृजनाचा अनुभव माती असो की माता या दोघींनाही तितक्याच गर्भकळा सोसूनच घ्यावा लागतो. कोंब बाहेर येताना मातीलाही वेदना होतात आणि मातेलाही नवअर्भकाच्या प्रसूतीच्या वेदना सोसाव्या लागतात. या चिमणपावलाच्या चाहुलीने कवयित्रीला नवसृजनाचे  विश्व सापडल्याचा आनंद होत आहे. हाच अनुभव त्यांनी बाई आणि माती या कवितेतूनही शब्दबद्ध केला आहे.दोघींची जातकुळी एकच बाई आणि मातीची असे त्या कवितेत त्यांनी म्हटले आहे. 
हा सृजनाचा आनंद सहजासहजी मिळत नसतो. त्यासाठी कष्ट आणि दुःख दोन्ही झेलावे लागते. कवितेचेही सृजन असेच असते. या ओळीत कवयित्री म्हणते वाटेवरचे दुःख प्रियजनांनी वेचून आपल्याला जगताना हात दिला व सुखाचे जीवन जगण्यास मदत केली.  त्याचवेळी आपल्या पदरात पुण्य आपसूकच पडले अगदी नको नको म्हटले तरीही. 
स्नेह जुळविता पुलाखालुन खूपच पाणी वाहून गेले आहे. सृजनाच्या या प्रवासातला हा अनुभव अत्यंत विलक्षण आहे. हे अनुभाचे पाणी आपण ओंजळीत घेतले तर काही पाण्याची आपल्या पापणीत त्याची गाणीच झाली. हा एका मातेचा आणि कवितेच्या जन्माचा असा समासमा संयोग आहे. 
हे नवअर्भकाच्या जन्माचे स्वप्न सुखद आहे. अगदी प्रसववेदनांच्या कळांची किंमत सोसून बाई किंवा कवी हे सृजन करीत असतो. ही निर्मिती प्रक्रिया कशी असते. आई बनणं किंवा कविता जन्मणं ही प्रक्रियाच मनात अत्तर आणि तळहातावर रंग, दरवळ सोडून जाते. हे होताना सुखस्वप्नाचा संग तिला किवा त्याला सोबत करतो. 
प्रत्येक स्त्रीचं अस्तित्व मातृत्वावर समाज मान्य करतो. अन्यथा वांझ स्त्रीच्या वाट्याला जे दुःख येतं ते अगदी दुस्तर आणि कठीण असतं. समाजाचे टोमणे हे त्या दुःखाहून अधिक प्रखर असतात. त्या आगीत होरपळत तिला जीवन कंठावे लागते. तद्वत नवनिर्मिती करणाऱ्या प्रत्येकाला किंवा प्रत्येकीला मग ती माती असो. ते बीज पोटात घेऊन त्यातून कळा सोसत नव सृजनाचे हे आत्यंतिक वेदना सोसूनही अगदी सुखदपणे करायचं असतं. कवी किंवा कवयित्रीच्या वाट्यालाही हे सुख आणि दुःख येतंच. 
मनाच्या गाभाऱ्यात कविता आणि स्त्रीच्या (मग ती बाई असेल, गाय असेल, लता किंवा वेल असेल अर्थात कोणतीही मादी असेल) गर्भात प्रसवत असते. तरीदेखील त्या संकल्पनेला जन्म देण्याचा सोस प्रत्येकीला वा प्रत्येकाला असतो (अर्थात शब्दाला शब्द किंवा अक्षराला अक्षरे जुळवून कविता करणाऱ्याला त्याची कल्पना येणारच नाही. या कळा कितीही सोसाव्या लागल्या तरी सर्जनाचा किंवा सृजनाचा जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. कवयित्री म्हणते हे शब्दसखी तू जन्माला येऊन माझ्या मस्तकी अस्तित्वाचा टिळा लाव. 
नवसंकल्पना प्रकट झाली की ती कोवळी असते. तिची साद गोजिरी असते. ती ऐकण्यासाठी सर्जनशील मन अगदी आतुर असते. ती ऐलतीरावर उभी राहून कवितेला, नव अर्भकाला साद देते. त्याच वेळी ती संकल्पना, ती कविता किंवा नवसर्जन पैलतीरावरून आपल्या जन्मदात्रीला किंवा जन्मदात्याला प्रतिसाद देते..  हा अनुभव लख्ख चांदण्यासारखा असतो. 
अर्थात प्रत्येकाचा याबाबतीत वेगळा अनुभव, वेगळी भावना व वेगळ्या प्रसवकळा असतील. त्याचा अर्थ जाणवणे हीदेखील एक प्रसव कळा किंवा वेदना असू शकते. त्या भावनेशी आपण एकरूप झालो तरच ती प्रकट होते. त्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ते मातीकडं, मातेकडं आणि भावनेशी एकरूप होणाऱ्याकडं असावं लागतं. 
या कवितेचा अर्थ ताडून पाहताना माझ्या संकल्पना आणि कवयित्रीच्या मनातील कल्पना आणि संवेदना वेगळी असू शकते.  रसिक वाचकहो आपणही या कवितेशी समरस होऊन त्याचा अनुभव घ्या.....

प्रकाश रामचंद्र क्षीरसागर (९०११०८२२९९) 
ताळगाव, गोवा 
Prakashkshirsagar.blogspot.com वरदेखील या रसग्रहणाचा व माझ्या इतर साहित्याचा अनुभव घ्यावा.

No comments: