Monday, May 11, 2020

काव्यास्वाद

<काव्यास्वाद - लिहिणाऱ्या हातांचा उत्सव बाईपणाची कहाणी सांगणारी कविता रेखा मिरजकर यांनी स्त्री वेदनेला दिलेलं आभाळ गोव्यातील स्त्रीवादी लेखिकांमध्ये काही नावे ठळकपणे घ्यावी लागतील त्यात रेखा मिरजकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. या मांदियाळीत माझ्या माहितीप्रमाणे रेखा ठाकूर, दया मित्रगोत्री, अंजली आमोणकर, चित्रा क्षीरसागर, अंजली चितळे, संगीता अभ्यंकर, कविता बोरकर अशी नावे डोळ्यांसमोर येतात. अर्थात ही वानगीदाखल काही नावे आहेत. रेखा मिरजकर या केवळ कवयित्री नाहीत तर कथालेखन, ललित आणि कादंबरीलेखनातही त्यांचा हातखंडा आहे. त्यांचे पाऊलखुणा व पांगारा हे कथासंग्रह, इटुकलं घरं पानाविण चाफा हे ललितलेखसंग्रह तसेच मोठी तिची सावली व जिणे गंगौघाचे पाणी या दोन कादंबऱ्या आणि बोली आरुषाची हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांना गोमंतक मराठी अकादमीचे अनुदान तसेच पाऊलखुणा या संग्रहाला गोमंतक मराठी अकादमीचा साहित्य पुरस्कार आण गोमंत विद्या निकेतनचा पुरस्कार आदी पुरस्कार त्यांना लाभले आहेत. संमंध सप्तपदीनंतरच्या प्रवासात तुझ्याबरोबर चालताना अनामिक ऊर्मीनं, माझ्यातून मला वेगळं करून टांगून ठेवलं झाडावर ! तुझ्याबरोबरचा प्रवास तसा सुखकर झाला... अचानक एका अनामिक वळणावर झाडावर टांगलेलं `मी’च संमंध समोर उभं ठाकतं विचारतं मला विसरलीस? दाटून येतो गळा स्मरतात चंद्रगाणी परीकथेत रमणारी ती अनभिषिक्त वेडी राणी समोर उभे संमंध भूत-भविष्य त्याच्या डोळ्यांत मी चेहरा हरवलेली तळ्यात- मळ्यात – तळ्यात मळ्यात...... रेखा मिरजकर विवाहित स्त्रीची कहाणी त्या इथे नमूद करतात. आपलं पूर्वीचं अस्तित्व म्हणजे माहेरची लाडाची मुलगी, तिचे निरागस शैशव, बालपण आणि पौगंडावस्थेतील ती अल्लड मुलगी असे बदल तिच्यात माहेरातच होत असतात. तिला उपवर झाल्याचे पाहून मात्र आईवडील तिला जबाबदारीची जाणीव करून देतात. आपलं अस्तित्व विसरून ती विवाह मंडपात दाखल होते. तिथे तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते. कुमारी आता सौभाग्यवती होऊन कुणाच्या तरी दारात येते. लग्न झाल्यानंतर ती आपल्यातील अल्लडपणा अथवा बालिशपणा विसरण्याचा आटोकाट प्रयत्न करते. जुन्या जमान्यातील ती मुलगी असल्याने आई तिला पदोपदी उपदेश करून संसार म्हणजे काय, तिथे तुझ्या इच्छा, आशा आणि आकांक्षा नेहमीच बाजूला सारून पतीशी एकरूप व्हावे, असा बोध आई-वडील आणि इतर वडीलधारे सतत करत असल्याने ती आपले अस्तित्व विसरू लागते. सप्तपदीबरोबर तिचा नवा जन्मच होतो जणू. सप्तपदीनंतर तिच्या भूमिका बदलतात. ती पत्नी तर झालेली असतेच. हळूहळू ती माता बनते, एकेक नव्या भूमिकांत ती इतकी एकरूप होऊन जाते की. जणू तिनं तिचं अस्तित्व झाडावर टांगून ठेवलेलं असतं. एके दिवशी अचानक तिच्यावरील संसाराच्या जबाबदाऱ्या, मुलाबाळांचे शिक्षण संपते त्यांचे लग्न होऊन ती स्वतःला मोकळ मोकळं समजू लागते. त्याच्याबरोबरच (पती) आतापर्यंतच प्रवास त्याच्या साथीनं आणि त्यानं समजुतीनं आणि तिनंही थोडं झुकवून घेतल्यानं सुखाचा झालेला प्रवास तिला सुखावून जातो. थोड्या प्रौढ झाल्याची जाणीव तिला होते आणि अकस्मात तिच्यातील मी बाहेर डोकावू लागतो. तो तिला मोकळा श्वास घेण्यास खुणावतो. काही बंधनं झुगारण्याचा ती काहीसा प्रयत्न करतेही. तिचा झाडावर टांगलेला मी अकस्मात समोर दत्त म्हणून उभा राहून तिच्या अस्तित्वाची जाणीव तिला करून देऊ पाहतो. तिचं बालपण तिला आठवतं. आपण आपल्या कौमार्यावस्थेत पाहिलेली स्वप्न आणि स्वप्नातील राजकुमार तिच्याभोवती फेर धरू लागतो. तीचा गळा दाटून येतो. आणि तिला आठवतात ती चंद्रताऱ्यांची गाणी. कुठे तरी कथा- कादंबऱ्यांतून वाचलेली वर्णने त्या राजकुमारीचा राजकुमार तिला चंद्रतारे आणून देण्याचे आश्वासन देतो. तिच्या सर्व स्वप्नांना एक मूर्त स्वरूप देण्याचे तो राजकुमार देत असतो. वास्तवात मात्र परिस्थितीचे चटके सोसत आणि सगळ्या स्वप्नांना विसरून तिला स्वप्नरंजन सोडावेच लागते. तिच्या मी पणाचे अहंकाराचे, अभिमानाचे, अस्तित्वाचे संमंध तिनेच झाडावर टांगून टाकलेले असते. संस्काराच्या, आईच्या ममतेच्या शब्दांनी ती विसरलेले व विरलेले असते. तिचा भूतकाळ आठवून देणारे अस्तित्व आणि सुखद भविष्याची पुन्हा स्वप्न यात पुन्हा ती स्वतःचं अस्तित्व हरवून बसते. ती अशा वळणावर येऊन ठेपलेली असते की तिला मागेही फिरता येत नाही की वर्तमान बदलता येत नाही. भविष्य तर कुणाच्याच हातात नसतं. त्यामुळे सर्वांचं मन तळ्यात मळ्यात करतं, हे वास्तव कवयित्री खुबीने वर्णन करते. रेखा मिरजकर यांच्या कथनात कुठलाही आक्रस्ताळेपणा नाही किंवा अगदी मलूल झालेली प्राचीन काळातील स्त्रीही दिसत नाही. ती खंबीर आणि स्वतः निर्णय घेणारी स्त्री बनलेली दिसते. परिस्थितीने तिला कितीतरी चटके दिलेले असतात.ठेच आणि खस्ता खाव्या लागलेल्या असतात. त्यातून ती तावून सुलाखून निघालेली असते. ती काही जुन्या काळातील अन्यायात पिचणारी किंवा पिचलेली मध्यमयुगीन स्त्री नाही. किंवा बंडखोर आणि स्त्री मुक्ती चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे समाजात होत असलेली बदलती परिस्थिती या दोहोंच्या कचाट्यात सापडलेली ती स्त्री आहे. ती ना बंड करून उन्मुक्त व स्वैर होऊ पाहते. ती संस्काराच्या जंजाळात असते. परंपरेने घालून दिलेले दंडक आणि तिच्या मनाला भुलवणारा बंडखोरीचा भुलभुलैया या दोहोंत तिची घुसमट होते, या घुसमटीचे दर्शन ही कविता अगदीच संयमित शब्दांत आणि सूचकतेने करते. रेखा मिरजकर गेल्या कित्येक दशकांपासून लेखन करीत आहेत. तरी त्यांच्या मूळच्या स्वभावानुसार त्या शांत वृत्तीच्या असल्याने त्यांच्या कवितेत ती वृत्ती ओतप्रोत भरलेली दिसते. प्रकाश रामचंद्र क्षीरसागर (९०११०८२२९९) ताळगाव, गोवा

No comments: